Kedarnath : पांडवांनी बांधलेल्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे महत्त्व

 सनातन धर्मामध्ये भगवान शिवाचे स्थान खूपच उच्च आहे. सृष्टीचे संहारक अशी ओळख असलेल्या भगवान शिवाची पृथ्वीवर अगणित मंदिरं आहेत, मात्र यातल्या 12 ज्योतिर्लिंगांना असलेले महत्त्व औरच आहे. भारतात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच 12 ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग म्हणजे ‘केदारनाथ’. उत्तराखंड राज्यात वसलेले जगप्रसिद्ध केदारनाथ ज्योतिर्लिंग हे अतिशय जाज्वल्य देवस्थान आहे. केवळ 12 ज्योतिर्लिंगच नाही तर अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेमध्ये देखील केदारनाथ मंदिराला स्थान आहे. अशा या केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले आहे. 

आज 22 एप्रिल रोजी मंत्रोत्तचारांच्या गजरात केदारनाथ मंदिराचे सहा महिन्यांपासून बंद असलेले दरवाजे उघडले गेले. आजपासून पुढील सहा महिने अर्थात नोव्हेंबरपर्यंत, केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले राहतील. केदारनाथ मंदिर हे सहा महिने अतिजास्त होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद असते. तर उरलेले सहा महिने खुले असते. आज मंदिराचे दरवाजे उघडल्या गेल्याने भाविकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून, ज्यांना ज्यांना केदारनाथचे दर्शन घ्यायचे ते सर्व भाविक आता शिवाचे दर्शन सहा महिने घेऊ शकता. हे मंदिर महाभारतातील पांडवांनी बांधले होते, नंतर आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी पुन्हा बांधले.

केदारनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गढवाल हिमालय पर्वतरांगांमध्ये स्थित सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील ‘छोटा चार धाम यात्रे’चा एक भाग आहे. हे मंदिर 3,583 मीटर उंचीवर आहे जे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंच आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे. केदारनाथ मंदिर हिमाच्छादित आणि समोरून मंदाकिनी नदी वाहणाऱ्या उंच पर्वतांच्या मधोमध वसलेले आहे. सध्याचे केदारनाथ मंदिर आदि शंकराचार्यांनी बांधले आहे आणि मूळतः हजार वर्षांपूर्वी पांडवांनी मोठ्या आयताकृती साच्यावर दगडी स्लॅबमधून बांधले होते.

केदार हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे ज्याचा अर्थ संरक्षक आणि संहारक आहे. केदारनाथ हे शिवाला समर्पित असलेल्या सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते की या मंदिराच्या दर्शनाने भक्तांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. केदारनाथ मंदिराबद्दल एक आख्ययिका सांगितले जाते. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांच्या चुलत भावांना, कौरवांना मारल्यानंतर पांडवांना अपराधी वाटले. म्हणून त्यांना भगवान शिवाने त्यांच्या पापांपासून मुक्त करावे अशी त्यांची इच्छा होती. महादेव शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले. मात्र, शिवशंकर त्यांना दर्शन देण्यास इच्छुक नव्हते. पांडवांना समजू नये, यासाठी त्यांनी वृषभ रुप धारण केले आणि प्राण्यांच्या एका कळपात सहभागी झाले. 

भीमाला ही गोष्ट समजली. त्याने विशालकाय देह धारण केला. तेव्हा अन्य प्राणी भीमाच्या दोन पायांमधून निघून गेले. मात्र, शिवनाथ तेथेच राहिले. तेव्हा भीमाने वृषभाच्या पाठीवरील वशिंड धरले. पांडवांचा दृढ संकल्प पाहून शिवशंकरांनी आपला निश्चय बदलला आणि पांडवांना त्यांनी दर्शन दिले. पांडवांना त्यांच्या सर्व पापांतून मुक्ती मिळाली. वृषभाच्या पाठीवरील वशिंडाच्या आकारात असलेल्या शिवलिंगाची पूजा केदारनाथ मंदिरात केली जाते. शिवशंकर वृषभाचा अवतार घेऊन अंतर्ध्यान पावले, तेव्हा त्यांच्या शरीराचा वरचा भाग पशुपतीनाथाच्या रुपाने नेपाळमधील काठमांडू येथे प्रकट झाला. शिवाच्या भुजा तुंगनाथ येथे, तर मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले. महादेवांची नाभी मदमहेश्वर येथे, तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. शिवाच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे आहे. म्हणूनच या पाच ठिकाणांना ‘पंचकेदार’ असे म्हटले जाते. या पाचही ठिकाणी महादेवाची भव्य मंदिरे आहेत, असे सांगितले जाते.

केदारनाथ मंदिर हे सहा फूट उंचीच्या चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर अस्लर शैलीमध्ये बांधले गेले आहे, ज्यामध्ये स्लॅब किंवा सिमेंटशिवाय दगड एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिर परिसराचा उल्लेख महाभारतातही आढळतो. मंदिराला गर्भगृह आहे. या गर्भगृहात तीक्ष्ण खडकाची सदाशिव रूपात भगवान शंकराची पूजा केली जाते. अंगणाबाहेर नंदी बैल वाहनाच्या रूपात विराजमान आहे. मंदिराच्या मागे अनेक तलाव आहेत, ज्यामध्ये आचमन आणि तर्पण करता येते.

असे मानले जाते की केदारनाथ मंदिराचे रक्षण भैरो नाथ करतात. ते भगवान शिवाचे उग्र अवतार म्हणून ओळखले जातात. केदारनाथच्या मुख्य मंदिराच्या अगदी जवळ भैरोनाथाचे मंदिर आहे. अवताराला क्षेत्रपाल म्हणूनही ओळखले जाते, या अवताराचा विनाशाशी संबंधित आहे आणि म्हणूनच तो मंदिराचा रक्षक मानला जातो. भैरोनाथ हे मंदिराचे रक्षक आहेत, जे सर्व संकटांना मंदिरापासून दूर ठेवतात. असे मानले जाते की जे लोकं केदारनाथ मंदिरात जातात त्यांनी भैरोबाबा मंदिरात देखील जावे.

मंदिरातील पूजापाठ किंवा विधी विशिष्ट समाजातील लोकांकडून केली जाते. मात्र, मुख्य पुजारी मंदिरात धार्मिक विधी करत नाहीत. मुख्य पुजारी, ज्याला रावल म्हणतात, ते कर्नाटकातील वीर शैव जंगम समुदायाचे आहे आणि ते केवळ त्याच्या अधीनस्थांना कर्तव्ये सोपवू शकतो. मंदिरात पाच मुख्य पुजारी आहेत आणि प्रत्येक पुजारी आवर्तनात आपली कर्तव्ये पार पाडतो. मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की केदारनाथ मंदिरातील सर्व विधी फक्त कन्नड या भारतीय भाषेत केले जातात. ही प्रथा अनादी काळापासून पाळली जात आहे. तसेच, महान ऐतिहासिक मूल्यामुळे, शेकडो वर्षांपासून, विधी करण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

पौराणिक कथेनुसार, देवतांनी राक्षसांपासून वाचण्यासाठी भगवान शिवाची मदत घेतली, हे पाहून शिव बैलाच्या रूपात प्रकट झाले. असुरांचा नाश करण्याची ताकद असलेल्या बैलाचे नाव ‘कोडाराम’ होते. बैलाने असुरांचा त्याच्या शिंगे आणि खुरांनी नाश केला, त्यानंतर भगवान शिवाने त्यांना मंदाकिनी नदीत फेकून दिले. याच कोडाराम बैलावरून या मंदिराला केदारनाथ हे नाव पडले आहे. 

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एका पर्वतावर तुंगनाथ मंदिर आहे. या मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून ३,६८० मीटरवर आहे. या मंदिरात शिवशंकराच्या भुजांची पूजा केली जाते. कुरुक्षेत्रावर झालेल्या प्रचंड नरसंहारामुळे महादेव पांडवांवर नाराज झाले होते. शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी या मंदिराची उभारणी केली, असे सांगितले जाते. आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार, शिवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने याच पर्वतावर तपस्या केली होती. हे मंदिर पंच केदारनाथपैकी एक आहे.

दरवर्षी हिवाळ्यात सुमारे सहा महिन्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. या काळात कोणालाही मंदिरात प्रवेश नसतो. तरीही अशी श्रद्धा आहे की मंदिराच्या गर्भगृहातील दिवा अखंड पेटत राहतो. स्थानिक लोकांच्या मते, बंद कपाटांमागून कधी कधी घंटानाद ऐकू येतो. पुराणांमध्ये याचा उल्लेख असा आहे की या काळात देवताच स्वतः येथे पूजाअर्चा करतात. गर्भगृहात असलेले ज्योतिर्लिंग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर नैसर्गिक स्वरूपात जणू यज्ञोपवीत आणि स्फटिकमाळ दिसते, अशी श्रद्धा आहे. मंदिरातील चार मोठे स्तंभ चार वेदांचे प्रतीक मानले जातात. 

मंदिराजवळील “रेतस कुंड” बद्दल अशी मान्यता आहे की “ॐ नमः शिवाय” उच्चारल्यावर पाण्यात बुडबुडे निर्माण होतात. गौरीकुंड येथे गरम पाण्याचे कुंड आहे, जिथे स्नान करूनच यात्रा सुरू केली जाते. असे मानले जाते की येथे देवी पार्वतीने तपस्या केली होती. काही कथांनुसार, देव-दानवांच्या युद्धात शिवांनी बैलाच्या रूपात प्रकट होऊन दानवांचा संहार केला आणि त्याच घटनेवरून “केदार” हे नाव पडले. 

this blog was originally published on https://gajawaja.in/kedarnath-mandir-opening-today-know-temple-history-and-secrets/

Comments

Popular posts from this blog

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे