Shriram : प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा

 आज चैत्र शुक्ल नवमी अर्थात राम नवमी. आजच्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांचा जन्म झाला. भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर श्रीरामांचा अयोध्येमध्ये जन्म झाला होता. रामायण आणि रामचरित मानस हे हिंदू धर्मातील दोन पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे परंतू आदिकवि वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्यभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा जाणून घेऊया. 

महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषी-मुनींना आणि वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता ऋंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त झाले होते. 

अशातच यज्ञातून देव पायस घेऊन प्रगट झाले. राजा दशरथाने ते पायस घेतले आणि पत्नी कौशल्येला दिले. त्यातून अर्धा हिस्सा कौशल्येने कैकैला दिला. मग आपल्यातला अर्धा अर्धा हिस्सा त्या दोघींनी तिसरी राणी सुमित्राला दिला. पुढे दशरथ राजाने यज्ञस्तही आलेल्या सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धन-धान्य, गौ इतर भेट देऊन निरोप दिला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरुप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.

चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अर्थात राम नवमीला पुनर्वसु नक्षत्रात श्रीरामांचा जन्म झाला. श्रीरामांच्या जन्माच्यावेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती. या दिवशी पाच ग्रह सूर्य, मंगळ. गुरू, शुक्र आणि शनि आपल्या उच्च राशीत स्थित होते. या ग्रहांच्या शुभ प्रभावात त्रेता युगात राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला. शिशु नील वर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतीवान आणि अत्यंत सुंदर होते. त्या शिशुकडे बघणारे टक लावून बघतच राहायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयीने भरत यांच्यासह तिसरी राणी सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुग आणि द्वापर युगातील संधिकालात झाला. परंतु आधुनिक संशोधनानुसार भगवान श्रीरामांचा जन्म इ.स.पूर्व 5114 वर्षा पूर्वी झाला होता. म्हणजे त्याचा जन्म आजपासून 7136 वर्षांपूर्वी झाला. 

श्रीरामाचा जन्म कोणत्या वेळी झाला : भगवान रामाचा जन्म दुपारी 12.05 वाजता झाला. त्यावेळी देवाचा प्रिय अभिजित मुहूर्त होता. तेव्हा फारशी थंडी किंवा ऊनही नव्हते. वाल्मिकीनुसार, श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथी आणि पुनर्वसु नक्षत्र या दिवशी झाला जेव्हा पाच ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर होते. अशा प्रकारे सूर्य मेष राशीमध्ये 10 अंशांवर, मंगळ राशीमध्ये 28 अंशांवर, गुरू कर्क राशीमध्ये 5 अंशांवर, शुक्र मीनमध्ये 27 अंशांवर आणि शनि तूळ राशीमध्ये 20 अंशांवर होता. श्री राम यांचा जन्म भारतातील सरयू नदीजवळ वसलेल्या अयोध्या शहरातील एका राजवाड्यात झाला. सात पुरींपैकी अयोध्या ही पहिली मानली जाते. 

चैत्र शुक्ल नवमीला जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेव्हा हा शुभ काळ सर्व जगाला शांती देणारा होता. त्याचा जन्म होताच वारावरण चैतन्याने भरले होते. थंड, मंद आणि सुगंधी वारा वाहत होता. देवता प्रसन्न झाले आणि ऋषी आतुर झाले होते. जंगले बहरली होती, पर्वत रांगा दागिन्यांसारख्या चमकत होत्या आणि सर्व नद्या अमृताने वाहत होत्या. त्यांचा जन्म होताच ब्रह्माजीसह सर्व देव सजवलेल्या विमानांमध्ये आले. निरभ्र आकाश देवांच्या समूहांनी भरले होते. गंधर्वांचा समूह गुणगान करू लागला. सर्व देव रामलाला भेटायला आले. राजा दशरथाने नंदीमुख श्राद्ध केले आणि सर्व विधी इत्यादि पार पाडल्या आणि द्विजला सोने, गाय, वस्त्रे आणि रत्ने दान केली. संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण होते. ध्वज आणि तोरणांनी शहर व्यापले होते. सगळीकडे फक्त आनंद दिसत होता.

संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराजांच्या घरी चार पुत्रांच्या जन्मामुळे गंधर्व गायन करु लागले. अप्सरा नृत्य करु लागल्या. देवता आकाशातून फुलांचा वर्षाव करु लागले. महाराजांनी मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान-दक्षिणा दिली. दशरथ राजाने पुरस्कार स्वरुप प्रजेला धन-धान्य आणि दरबारात असणार्‍यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले.

श्रीराम हे विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्प काळातच ते सर्व विषयांत पारंगत झाले. आपल्या भावांपेक्षा ते अधिक हुशार आणि तेजस्वी होते. त्यांची कीर्ती सतत दूरवर पोहचत होती. प्रभू रामाचें आपल्या तिन्ही भावांवर प्रचंड प्रेम होते.राम हे सर्व प्रकाराच्या अस्त्र-शस्त्र हाताळणे आणि हत्ती-अश्व यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. सतत माता-पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे तिघं भाऊ देखील त्यांच अनुसरण करायचे. चारी भावांमध्ये कायमच आपल्या गुरुंबद्दल आदर आणि श्रद्धा होती. चारी भावडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती. या चौघं मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरुन जात असे.

this blog was originally published on https://gajawaja.in/shri-ram-navami-special-know-shrirams-birth-story/

Comments

Popular posts from this blog

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे